Marathi Katha





गुढीपाडवा... 


           ज्या दिवसाची वाट पाहत, श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस. 
          ज्या दिवसाची वाट पाहत, भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस.
          ज्या दिवसाची वाट पाहत, चौदा वर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे संन्यासी जीवन व्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस.

          प. पू. अनिरुध्द बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा सांगितली होती.


                ज्या क्षणाची वाट पाहत सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांना आनंद बहरत होता. सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम, माता सीता, लक्ष्मणासह, सुग्रीव आणि समस्त वानर सैनिकांसहित परत आले होते. हनुमंत भक्तश्रेष्ठ भारताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहोचले होते. राजमहालात पोहोचल्यावर सर्वांचेच जोरदार स्वागत झाले. श्रीरामचंद्रानी राजमहालातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले. नंतर श्रीराम माता सीतेसह लक्ष्मण, भरत आणि हनुमंत अयोध्येतून फेरफटका मारावयास निघाले. चौदा वर्षे संन्यासाप्रमाणे जीवन जगणारी अयोध्या नगरी आज विविध रंगांनी नटलेली होती. विविध रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजलेले होते. सर्व अयोध्या वासियांनी आपल्या लाडक्या श्रीरामचंद्राच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी वस्त्रांची गुढी दारात उभारली होती. सर्व अयोध्या वासियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पंचायतन सुखवत होते, आशीर्वाद देत होते.
              अयोध्येचे हे सौन्दर्य न्याहाळताना लक्ष्मणाची नजर एका गुढीवर गेली. जी गुढी फक्त साध्या, जुन्या वस्त्राची उभारली होती. त्यावर लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले, "बंधू! ती गुढीच फक्त का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे?" त्यावर श्रीराम म्हणाले, "चला आपण त्या घरात जाऊन पाहुयात." पंचायतन त्या घरी पोहोचल्यावर त्या घरातील सर्वांना अतिशय आनंद झाला. पंचायत्नाच्या स्वागतासाठी सर्वांची एकच लगबग उडाली. श्रीरामचंद्राबरोबरील सर्वांचे त्यांनी योग्य रीतीने स्वागत केले. सर्वांचे क्षेमकुशल विचारून श्रीरामचंद्रांनी प्रश्न केला," फक्त आपल्या घरासमोरील गुढी का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे?" यावर त्या घरातील एक व्यक्ती म्हणाला," देवा, आपण येणार म्हणून आम्ही सर्वजण आनंदून गेलो होतो. पण आमच्या घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती खूपच आजारी होती म्हणून दुःखी होतो. मनोमन तुमची प्रार्थना करत होतो कि त्यांना तुमचे दर्शन होवो. पण त्यांनी त्यांची अखेरची घटिका ओळखली होती. त्यांनी घरातील सर्वांना जवळ बोलावून घेतले व म्हणाले,' मला काही श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही असे वाटते. माझ्याकडे आता मोजकेच श्वास शिल्लक आहेत. तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही शोक करत बसू नका. त्याऐवजी श्रीरामचंद्रांच्या स्वागतात आनंदाने सहभागी व्हा. माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी जी गुढी उभाराल ती मात्र ह्या वस्त्राने उभारा, कारण श्रीराम जेव्हा अयोध्येतून निघाले होते तेव्हा त्यांची चरणधूळ या वस्त्रामध्ये मला 'कृपाशिर्वाद' म्हणून मिळाली होती.'
             सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते. श्रीरामांच्या चेहऱ्यावर अतीव करूणा दाटली होती. ते गुढीजवळ गेले व त्यांनी आपल्या कंबरेचा शेला काढला आणि त्या गुढीवर लावला व त्या गुढीवरील ते जुने वस्त्र आपल्या कंबरेला बांधले. तो क्षण सर्वांच्या मनाला मोहून गेला. तो क्षण श्रीरामचंद्रांनी त्यांच्या भक्तांबद्दल असणाऱ्या प्रेमाची साक्ष देत होता.
              त्यानंतर सर्वजण राजमहालात परत आले. आता सर्व वानरसैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम माता सीतेने आखला होता. त्यानुसार सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. शेवटी हनुमंताची वेळ आली. आता माता सीतेला प्रश्न पडला कि हनुमंताला कोणती भेट द्यावी? त्यावर त्यांनी हनुमंतालाच विचारले, "तात! आपणाला आम्ही कोणती भेट द्यावी?" त्यावर हनुमंत  म्हणाले," माते, श्रीरामांनी मला सर्वकाही दिले आहे. पण तू म्हणतेच आहेस तर मला आज एका गोष्टीचा मोह होतोय,' श्रीरामांनी त्यांच्या कंबरेभोवती बांधलेल्या त्या जुन्या वस्त्राचा.'
     त्यावर माता सीतेने स्वतः ते जुने वस्त्र श्रीरामांच्या कंबरेचे काढले आणि हनुमंताच्या कंबरेला बांधले. भकांच्या प्रेमापेक्षा त्यांच्यावर दुप्पट प्रेम करणाऱ्या श्रीरामांचा आणि हनुमंताचा सर्वांनी जयजयकार केला. 

     "प.पू. बापू त्यावेळी म्हणाले होते कि," हि कथा जो कुणी गुढीपाडव्याच्या दिवशी स्मरण करेल त्याला काय मिळेल ते मी आता सांगणार नाही."
!!हरिओम!!        
       

 

Comments

Post a Comment